Wednesday, March 26, 2014

अगदी तेव्हाच

संपले पुस्तक होते राहिले, शेवटचे एक पान
पडाव होता दूर थोडाच, तुला त्याची आस

झिजलेल्या काळ्या धाग्याची, गळ्यामधे गुंफण
झाली होती भाळावरली, चिरी फिकी पण

पायाखाली रिती थोडी, अजून होती वाट
प्राणामधे शिल्लक होते, अजून थोडे त्राण

फांदीवर तगून राहिलेली, पिवळी एक शेंग
आलाच होता पडायला, अळूवरचा थेंब

चोचीमधे होता उरला, फक्त शेवटचाच घास
होतच आली होती पूर्ण, फिनिक्स पक्षाची राख

गळ्यात होते थरथरते, सुंदर एक गान
शेवटचीच होती मैफलीत, भैरवीची तान

शेवटचा अजून चालूच होता, एक श्वास 
चेह-यावरचा मुखवटा उतरला, अगदी अगदी तेव्हाच

Tuesday, March 25, 2014

आठोळी (?)


जिवावर उदार होऊन
वार्‍यावर स्वार होऊन
दिपवणार्‍या एका क्षणासाठी
आकांत लाटेवरच्या थेंबाचा !

त्याचेच नाते सांगताना
माझी मात्र घोषणा
"आयजीच्या घामावर
चमकण्याची... !"

३०.११.१९८६

Wednesday, February 19, 2014

गोधडी

फिरले मि दाही दिशा
रुजवली नाती नवी
जोड जोडले आप्त काही
पण भेटले ना मलाच मी

आत शोधते आज काही
रुजवते आज नवीन बी
खुणावते दिशा नवी
आशेस येई पालवी

मनातली धूळ जुनी
पुसूनी केली पाटी नवी
झाल्या गेल्या काळाची
शिवून टाकली गोधडी

टोचणा-या कित्येक गोष्टी
गुंफल्या एका मेकीतुनी
उरे न आता बोच कुठली
भोग सारे भोगुनी

गोधडी माझी सखी
उब देई, देई उभारी
संगती माझ्याच मी
शोधेन, भेटेन, मलाच मी

Wednesday, July 31, 2013

ये, सखये ये ....

तसे केव्हाच तुला बुडवले
डोहात, खोल खोल आत
तुझे गुदमरणे, तुझे हुंदके
अगदी गिळून टाकले कधीचे

जिवंतपणाचे लक्षणी बुडबुडे
वर येऊन फुटू नयेत म्हणून
त्या तळ्यावरच सा-या,
बांधून टाकली मोठी कबर;

सणसणीत व्यवहाराची, दिखाऊ, सुबक
त्यावरल रचले कित्येक साज, फुले
पण जाणीवपूर्वक,  शोभेचे.
फुलण्याचा शाप नको म्हणून

हुश्श्य...
मोठा श्वास घेतला, 
चला आता काळजी मिटली
एक मोठा उसासा टाकला,

अन झाले,
तू तशीच
पुन्हा वर,
जिवंत...

तशीच जलजळीत सत्य घेऊन,
भळभळणा-या वेदना घेऊन,
टोचणा-या संवेदना घेऊन.
अन सोबत,
माझ्या जिवंतपणाचा दाखलाही घेऊन

ये, सखये ये ....

Friday, February 1, 2013

जिवंत!


ओली जखम!

सुकली, खपलीही धरली
खपली सुकली; पडूनही गेली
व्रण,...तो ही झाला; 
फिका ... फिका

वाटलं
सारं शांतावलं
झाला त्या
वादळाचा अंत...!

अन एका
ऊबदार क्षणी
सारे भसाभस
ऊतू गेले

किती प्रयत्नांनी
वरून घातलेले
निर्विकारपणाचे खडक
पाझरले, वितळले

खाली तसाच;
तसाच्या तसाच
लाव्हा खदखदत
जिवंत!

Wednesday, November 14, 2012

ऋतुचक्र

उन्हाच्या झळा, 
आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, 
बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, 
दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, 
हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, 
"वसंत" पिंगा घालू लागतो

आभाळात काळे-निळे ढग, 
डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, 
वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, 
भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर आता 
अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून 
"ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते

आता फुटतो आवाज 
लकेर घुमत जाते पेर्ते व्हा, पेर्तेव्हा
शेता शेतात, लगबग 
घाईगडबड वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, 
उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, 
अक्षरशः कोसळू लागते
सा-या सृष्टीला नाहू घालण्यासाठी, 
"वर्षा"राणी धाऊन येते

लेकूरवाळ्या फांद्या डोईवर 
हिरवा पदर घेऊ लागतात
गोजि-या रंगबिरंगी फुलांची, 
परडी सजू लागते
दाट धुक्याची ओढणी 
धरती अलगद ओढून घेते
नदी धीर गंभीरपणे, 
संथ-शांत वाहू लागते
"शरदा"च्या शीतल चांदण्यात, 
मुलायम स्वप्न फुलत जाते

गारवा हळुहळु अलगद 
सारीकडे पसरू लागतो
दिवसाचा प्रहर आता 
अगदी छोटा-छोटा होत जातो
सूर्यनारायणाचे तेजही आता
विझू-विझू होऊन जाते
सारी सॄष्टीच जणु काही
चिडिचूप होऊन जाते
अन "हेमंता"ची थंडीची दुलई, 
सारी सृष्टीच पांघरून घेते

थंडीचा कडाका आता 
हळुहळू वाढत जातो
आता नाहीच सहन होत 
झाडांना पानांचा भार
पिवळ्या पानांचे जडशीळ 
शालू, उतरवले जातात
भल्या थोरल्या रात्री, 
आता नकोशा होऊ लागतात
अंगावर शिरशिरी उमटवत, 
"शिशीर" आपले ठसे उमटवत जातो

अन मग पुन्हा, नवा कोकिळ
आपला नवा सूर शोधतो
एका नव्याच वसंताची चाहूल, 
सा-या सृष्टीला लागते
जुन्याचा मागोवा संपवून, 
नव्याचा शोधात ती गुंगून जाते
ऋतू मागुनी ऋतू, असे बदलते
असे गरजते-असे बरसते
युगायुगांच्या सुपीक कुशीत, 
"ऋतुचक्र" हे असे फिरते!
 ---

Thursday, August 30, 2012

खेळ मांडला ...

मानवी भाव-भावनांचा, खेळ मांडला मी
शतकी चलचित्रपटांची, गाथा मांडली मी

"राजा हरिश्चंद्रा"ची, पहिली वहिली कथा.....................(पहिला चलचित्रपट, १९१३)
गाऊ, बोलू लागली, ही "आलम आरा".........................( पहिला बोलपट, १९३१)
भारतीय चित्रपट पहिला, "आयोध्येचा राजा"................( पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट, पहिला मराठी चित्रपट, १९३२)
आली रंगूनी "सैरंध्री", शोभली सप्तरंगा.................... ..(पहिला रंगीत चित्रपट, जर्मनीत प्रोसेस केलेला,१९३३)
मिळू लागला न्याय, "अछुत कन्या" ला..................... (सामाजिक प्रश्नावरील चित्रपट, १९३६)
रंगविला भारतीय रंगात, "कृष्ण कन्हैया" ला.............. (भारतात प्रोसेस केलेला पहिला रंगीत चित्रपट, १९३७)

भयभीत झालो, पाहुनिया "अनारबाला" ........................ ( पहिला भयपट, १९४०)
"तातार का चोर' दिसे, अद्-भूत बरा............................ ( पहिला अद्-भूतरम्य चित्रपट, १९४०)
शास्त्रीय चमत्कार हा, "जादुई बंधन" ......................... . (पहिली सायन्स फिक्शन, १९४१)
"उम्मीद" ने भरली, विनोदाची कावड............................ ( पहिला विनोदी चित्रपट, १९४१)
गोष्ट सा-या कुटुंबाची, झाले "खानदान"........................ ( १९४२)
प्रेमिजनांची गुजगीते, गायी "तकदिर"............................ (१९४३)

''किस्मत''ने दिला, युद्धाचा दुहेरी चेहरा............................. (१९४३)
होई सा-या देशभर "एलान", स्वातंत्र्याचा........................... (१९४७)
देशासाठी कित्येक झाले, वीर "शहिद".............................. (१९४८)
"आनंदमठ" देई मंत्र, वंदे मातरम..................................... (१९५१)
देश भक्ती गीते गाती "हम हिंदुस्तानी"............. ............. (१९६०)
सैनिकांची "हकिकत" पोहचे गीतागीतातूनी........................ (१९६४)

गाण्यां सवे भिजुनी गेलो, "बरसात" मधे........................... (१९४९)
गानकोकिळा गुंजत राही, गूढ "महल" मधे........................ (१९५१)
"बैजु बावरा" च्या संगीतात, सारे सारे विसरे..................... (१९५२)
"नागीन" च्या डौलदार, नाचात मन रमे........................... (१९५२)
"चलती का नाम गाडी" तून, मस्त मी फिरे....... ............. (१९५८)
"अनारकली" च्या श्वासाबरोबर, श्वास माझा अडे... ......... (१९५३)

"दो बिघा जमिन" दे म्हणूनी, आयुष्य सारे सूने.............. (१९५३)
मांडला आयुष्याचा जुगार, या "फूटपाथ'' वर................... (१९५३)
''दो ऑंखे बारह हाथ'' उगारले दुखा:वर.......................... (१९५७)
''मदर इंडिया'' सवे, ओढला नांगर शेतात........................ (१९५७)
''काबुलीवाला'' सवे भोग, भोगले परदेशात...................... (१९६१)
रचविली दुखा: वर दुखे, ''देवदास'' च्या सवे........ ............ (१९५५)

हळुवार स्पर्षूनी ''सुजाता'', मोडिली बंधने....................... (१९५९)
''जंगली'' याहू तुनी वाहती, मुग्ध प्रेमासे झरे.................. (१९६१)
''मुगल ए आझम'' चा तराजू, तोल सांभाळे....... ............ (१९६०)
''बीस साल बाद'' पुन्हा, येत राहती आठवणी.................. (१९६२)
दिव्य त्या चल-चित्रांसाठी, ही माझी ''आरती''................. (१९६२)

Saturday, July 21, 2012

.... चांदणे माझ्या मनी |

(परवा मा. राजेंद्र कंदलगावकर गुरुजींच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना सुचलेले काही ....)


वेगळ्या रंगात असुनि, रंगते त्यांच्या सवे
रचलेली माळ त्यांची, शब्द-सूतात ओवते |

पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, सुस्वरांनी साजरी
सूर त्यांचे लीन सारे, भावपूर्ण स्वरांजली |

ओवला मोती हरेक, वाहिला श्री गुरुचरणी
साधकांच्या संगीतांचे, सूर कानी दरवळती

वेधता शब्दात सूरांना, शब्द ही झाले सुरिले
ओवलेल्या फुलांनी, सूत माझे गंधावले |

सूत-शब्द फक्त माझे, सूर्-मैफिल ही तयांची
पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, चांदणे माझ्या मनी |

Thursday, June 21, 2012

पावसाचे गाणे

गार गार हा सुटला वारा, वीज लागली कडाडु 

नाचत नाचत चला सख्यानो, पावसात या भिजू ||


सुवास सुटला सर्व फुलांचा, चला वेणी माळू

गोल गोल धरुनी फेर, गाणी मजेची गाऊ 


चुर्र कशाचा आवाज येई, आई करते खाऊ 

चटकदार कुरकुरीत, भजी कांद्याची खाऊ 


नवे वर्ष आले शाळेचे, चला दप्तर घेऊ 

नव्या गोष्टी, नवा अभ्यास, नवी गाणी गाऊ 


कोणी म्हणे आकाश रडे, म्हणून पडे पाऊस 

अश्रू त्याचे गोड पण, करती धरेस संपन्न 


जाण सखे ग, आपल्याच दुःखात नको राहूस 

तुझ्या आसवांचे व्हावे सिंचन, नव्या रोपट्यास 


उठून उभे राहो कोणी, पाहुनी जिद्द तुझी खास 

कसे जगावे, आनंदी राहावे, समजावे त्याचे त्यास


गार गार हा सुटला वारा, वीज लागली कडाडु 

नाचत नाचत चला सख्यानो, पावसात या भिजू ||

Tuesday, May 29, 2012

साथ

दु:ख, सुख, अपुरेपणा
सा-या सा-या आवरलेल्या वेदना
तू येताच मात्र, अश्रूंनी मुक्त व्हावं
असं का व्हावं, तुझ्या सहवासात

बंदिस्त वणव्यात, न फुटणारा
भाऊक गर्दीतही, न पाझरणारा
तुझ्या संरक्षक आपुलकीत मात्र
धडाधड कोसळतो, असा कसा हा बांध

रक्ताची ओढ, नात्याचा बंध
मैत्रीचा धागा, या सर्वांहूनही
तुझे केवळ अस्तित्वही
व्हावे केव्हढे आश्वासक

तुझ्याशिवाय मी, माझ्याशिवाय तू
दोघेही असूच. पण त्याही पेक्षा
एकमेकांसाठी, एकमेकांसह असणं
किती आनंददायी आणि परिपूर्णही !