माणसाचं आयुष्य म्हणजे
एक वसलेलं टुमदार गाव!
बालपणी डुबकी मारायला
पायथ्याशी असणारा शांत किनारा
ये, पुढे ये म्हणत
वाकुल्या दाखवणारी छोटी बोट
किनाऱ्यावरच्या छत्राखाली
मनसोक्त हुंदडणं.
अन तारुण्याच्या उभारीतलं
ते नावेतून स्वत:ला
झोकून देणं,
स्वत:च्याच परिसीमा जोखणं.
मग कधी तरी किनाऱ्याशीच जरा दूर
आपली बोट नांगरणं
तिथून आपली उंची, आपलं प्रतिबिंब
सिद्ध करत रहाणं.
अन मग कधीतरी
उंचावरच्या पर्वतावर
बसून केलेली साधना,
मन:शांतीसाठी केलेले ध्यान.
या सगळ्यात आकाशीचा
पांढरा शुभ्र, दिशा दर्शक
अभ्र बघायचा राहिलाच की...
अन राहिली सागरी
दूर वर टाकायची नजर.
पण असो,
आभाळीचे निळे अन
समुद्राचे निळे
दोन्ही पोहोचलेच की थोडे थोडे.
अन हाती आलेले सगळं
टुमदार सजलं, सजवलं.
अजून काय पाहिजे?
शिवाय पर्वतराशीवरून का होईना,
शुभ्र अभ्र अन त्याचं तेज
पोहोचलं थोडं थोडं.
म्हणतात ना, माणसाचं आयुष्य;
एक टुमदार गाव, वसलेलं!
---