Wednesday, February 24, 2010

कृष्णा....


काम तसे नेहमीचे
मन राधेचे गुंतलेले
अन अचानक ,
कानात बरसू लागले
आर्त सूर बासरीचे.

थंडीचे छोटे छोटे दिवस,
त्यातली धुक्याने गारठलेली सायंकाळ.
गावातले चिडिचुप्प झालेले रस्ते
गप्प उभ्याने रा़खण करणारी झाडे.
अंधुकलेल्या पायवाटा
यमुनेचा नीरव किनारा.
तिचे संथ हलणारे
निळे सावळे पाणी
त्यात तटावरच्या झाडांची
संथ हलणारी सावली.
चुबकन वर येणारी
एखादीच मासोळी.
अलवार चांदण्याची अष्ट्मी
पायाखाली रूतणारी शुभ्र रेती.

आर्त सूर आता
अधिकच तीव्र झालेत,
पण श्रीहरी तर
दिसत नाही.

"कुठे शोधू तुला माधवा?
हा तुझा लाडका कदंब...
पण तिथेही नाहीस तू.
अन हे काय ?
त्याच्या पावलात
हा बाण कसा रुतून बसलाय ?
अन त्यातून पाझरणारे
हे शुभ्र दूध ...?
ही जिवाची अशी घालमेल
श्रीरंगा संपव ही वेदना.
नको, नको, थांब जाउ नको
मलाही घे ना रे, ने ना रे
..........................."

अन मग एक स्तब्ध शांतता
................................... !

दुस-या दिवशीचा सूर्य उगवला
पण
आसमंतातला सूर हरवून गेलेला.
अन यमुना अश्रू ढाळत उभी ;
सोबत राधेचे कलेवर
अन
त्या तिकडे लां ऽऽऽऽ ब रानात
श्रीकृष्णाचे........ !

२१.०१.२०१०

No comments:

Post a Comment